बघ ना...!
पुन्हा नव्याने
अनोळखी बनून भेटता आलं असतं तर
किती बरं झालं असतं ना ?
सांधता आल्या असत्या
बधीर झालेल्या जखमा
अनाम पणाचा मलम लावून.
पुन्हा बसून विणता आली असती
भविष्याची स्वप्ने,
सोनेरी कल्पनांचा मुलामा देऊन.
पुन्हा बसता आलं असतं
एकाच बाकावर,
जीवनरुपी निर्वात पोकळीवर
चिंतन करत.
पुन्हा पहिली नजरानजर झाल्यावर
हसता आलं असतं
निरागसतेने,
सात जन्माची ओळख
असल्यागत.
पुन्हा गिरवता आली
असती प्रेमाची बाराखडी
ओळखीतल्या क्षणांतील
हृदयाला झालेल्या
व्रणांचे ओझे विसरून.
पण इतकं लक्ष्यात ठेव...!!!
अनोळखी बनुनही
नाहीच मिटल्या गेले,
हृदयावरील सारे व्रण,
तर तुला नी मला समजून घ्यावे लागेल,
की आपण खरंच वेगवेगळ्या वाटांचे
अश्वत्थाम्या सारखी जखम
घेऊन फिरणारे मुसाफिर होतो ते.
धीरज चौधरी...22/02/2022